Wednesday, November 7, 2012

दिवाळी बद्दल काही धार्मिक माहिती - संपूर्ण चातुर्मास या ग्रंथामधून


आश्विन वद्य द्वादशी पासून कार्तिक शुद्ध द्वितीये पर्यंत दिवाळी हा महोत्सव साजरा करतात.

वसुबरास- याला "गोवत्स द्वादशी" असे म्हणतात. गाईची तिच्या वासरासह पूजा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून त्यांची पूजा करतात. वसू म्हणजे द्रव्य या दिवशी. या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढली जाते. गाईची पूजा करताना तिच्या पायावर पाणी घालून मग हळद कुंकू लावून तिला अक्षता-फूल घालून ओवाळतात. तिच्या समोर पूरण- वगैरे सर्व पदार्थ केळीच्या पानावर  खायला ठेवतात. या दिवसापासून पणत्या लावण्यास सुरूवात होते.







धनत्रयोदशी- या दिवशी घरातील बायकांची न्हाणी करतात. लोक घरातील पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंध्याची हत्यारे, सोने- नाणे यांची पूजा करतात. धणे-गुळाचा नैवेद्य दाखवतात. या दिवसापासून आकाशकंदील लावला जातो. या दिवशी यमदीपदान करावे लागते. दक्षिण दिशेला तोंड करून कणकेचा एक दिवा लावायचा. यामराजाची अवकृपा होऊ नये म्हणून हे करावे लागते.


नरक चतुर्दशी- नरकासूर नावाच्या राक्षसाचा संहार श्री कृष्णाने आश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी केला. म्हणून याला नरक चतुर्दशी असे म्हणतात. या दिवशी सूर्योदयपूर्वी स्नान करावे. आंघोळ करताना उटणे, तेल, तिलाची पूड अंगाला लावावी. अर्धि आंघोळ झल्यावर आंघोळ करणार्‍याला औक्षण करावे. जो कोणी या दिवशी अभ्यांगस्नान करत नाही तो नरकात जातो असे म्हणतात.

लक्ष्मी- पूजन- फार पुर्वी बळी नावाचा राजा होऊन गेला. तो खूप श्रीमंत व पराक्रमी होता. त्याने आपल्या श्रीमंतीच्या जोरावर सर्वा देवांना व लक्ष्मीला सुद्धा कोंडून ठेवले. त्या वेळी श्री विष्णू ने वामनाचे रूप धरण करून  त्रिपद भूमीचे दान मागितले. आणि लक्ष्मीसह सर्व देवांची सुटका केली तो हाच दिवस. व्यापारी लोकांचे हिशेबाचे नवीन वर्षा या दिवसानंतर सुरू होते. या दिवशी पाटावर रांगोळी काढून तंदूळ ठेवावेत . त्यावर वाटी किव्वा तबक ठेवावे.  त्यात सोने चांदी, मोती, रुपया ठेवावे. त्यांची पूजा करावी. लाह्या, पंचामृत नैवेद्यात ठेवावे. 









पाडवा- बलिप्रतिपदा- बळीची दानशूरता पाहून वामनाने त्याला पातालाचे राज्य दिले. त्याची सेवा करण्यासाठी वामन बळीचे द्वारपाल झाले.. तोच हा दिवस. हा दिवस साडे तीन मुहूर्तां पैकी एक आहे. व्यापारी लोकांचे नवीन वर्ष या दिवशी सुरू होते. या दिवसिह पत्नीने पतीचे औक्षण करायचे असते. पतीने पत्नीला एखादा दागिना किव्वा प्रपंचाला उपयुक्त अशी वस्तू द्यायची असते. या दिवशी कन्याही आपल्या पित्याला ओवाळते. या दिवशी सगळे आपला आपला दिवाळीचा फराळ घेऊन  एक मेकांच्या घरी जातात .

भाउबीज- यमद्वितीया- या दिवशी यमराजाची बहीण म्हणजे यमुना हिने आपल्या भावला यमाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते. म्हणून हा सण भाउबीज म्हणून साजरा करतात. या दिवशी भो बहिणीला भेटवायास जातो. बहीण भावला ओवाळते. आपल्या शक्तीनुसार तिला प्रतीक म्हणून एखादी भेटवस्तू देतो. भाउ नसेल किव्वा जवळ नसेल तर चंद्राला ओवळून घायचे. 
  

1 comment:

Anonymous said...

please read this :)