Monday, October 7, 2019

श्रीराम आणि ऋषी भारद्वाज अग्निहोत्र संवाद

राम आणि सीता वनवासात होते तेव्हा,  चित्रकूट ला जायच्या आधी त्यांना तिथे पोहोचण्याचा मार्ग अग्निहोत्र करणाऱ्या भारद्वाज ऋषींनी दिला होता, त्यासाठी त्यांनी अग्निहोत्र करणाऱ्या भारद्वाज ऋषींची भेट घेतली होती, तेव्हा रामांनी त्यांच्याशी हे संभाषण केले,
"प्रणाम गुरु, मी अयोध्याच्या राजा दशरथाचा पुत्र, राम. " असे म्हणून रामांनी अग्निहोत्र ऋषींना वंदन केले. 
"यशस्वी भवः " असा आशीर्वाद त्यांना भारद्वाज ऋषींनी दिला. 

त्या नंतर त्यांनी लक्ष्मणाकडे हात करून लक्ष्मणांचीही ओळख करून दिली, "हा माझा भाऊ, लक्ष्मण. " लक्ष्मणाने काहीही ना बोलता लगेच त्यांना प्रणाम केला. 
"यशस्वी भवः " पुन्हा एकदा अग्निहोत्र करताना भारद्वाज ऋषींनी लक्ष्मणाला आशीर्वाद दिला. 

परंतु जेव्हा सीतेची ओळख केली तेव्हा त्यांचे शब्द खूप मौल्यवान होते,  "हि विदेही राजा जनक ची पुत्री आणि माझी कल्याणमयी भार्या, सीता. " 

ह्यातून काय अर्थ घेऊ शकतो आपण, सर्वप्रथम ते म्हणतात, 

"हि विदेही राजा जनक ची पुत्री "- श्रीराम सीतेचे स्वामी होते, तिचे पती होते, जन्मोजन्मीचे नाते होते त्यांचे,  त्यांचा तिच्याशी स्वकर्तृत्वावर विवाह झाला होता, तरीही तिची ओळख करून देताना त्यांनी, सर्वप्रथम तिच्या वडिलांचे मानाने नाव घेतले. त्यामुळे त्यांच्या  नम्रतेचा आपण बोध घेऊ शकतो. 

त्यानंतर ते म्हणतात, 
"माझी कल्याणमयी भार्या" - याचा अर्थ असा की, हि नुसती माझी भार्या म्हणजेच पत्नी नसून माझे कल्याण करण्याच्या हेतूनेच , सीतेने माझ्या आयुष्यात पदार्पण केले आहे, त्यामुळे माझी पत्नी नव्हे तर कल्याणमयी भार्या अशी ओळख त्यांनी करून दिली. श्रीरामांच्या या विश्वासाला सीता पात्र तर होतीच, परंतु त्यांचे हे शब्द सीतेला सुचवून देत की, माझ्या मुळेच माझ्या स्वामी श्रीरामांचे कल्याण होणे आहे. 
ह्यातून त्यांच्या विनम्रतेचा बोध होतो. 


भारद्वाज ऋषींनी रामांना राजा दशरथाच्या निर्णयाबद्दल विचारले असता राम सहजपणे म्हणाले की, "पिताश्री राजा दशरथाच्या या निर्णयाने खरे तर त्यांनी माझ्यावर उपकारच केलेत, त्यामुळे आज मला आणि सीतेला, तुमच्यासारख्या ऋषीमुनींनी भेट घेऊन ज्ञान, परमज्ञान प्राप्त होतेय. " 

त्यांचे हे शब्द खूप महत्वाचे आहेत, त्यातून हा बोध होतोय,
"मला आणि सीतेला ज्ञान प्राप्त होतेय"- आता ते एकटे नसून सीता, त्यांची पत्नी त्यांची अर्धांगिनी आहे आणि आपल्या  बरोबरीने आपली पत्नी आपली शुभचिंतक, आपली मैत्रीण ज्ञान मिळवेल ही  भावना दिसून येते.

त्यामुळे बोध असा कि पती पत्नी मध्ये कुठलेही अंतर नसावे. एक मेकांच्या कल्याणाचा दृष्टीकोन असेल तर त्यातून नक्कीच चांगली प्रजा, व त्या नवीन प्रजेला उत्तम संस्कार होऊ शकतात. 


Thursday, August 23, 2018

एक अनमोल राखी


रक्षाबंधन येते तेव्हा सर्व बहिणींना आस लागते भावाची. भावाच्या हाताला राखी बांधून त्याच्या कडे आपल्या रक्षणाचे वचन घेतात या बहिणी. बहीण भावाला एक आणणारा हा सण, श्री कृष्णाच्या कृपेने आपल्या देशात आनंदाने साजरा केला जातो. हा सण आला कि टीव्हीवर जाहिराती येतात, भाऊ कसा बहिणीला छान छान भेटवस्तू देतोय, तिचे लाड पुरवतोय, तिची काळजी घेतोय. 

राखी साजरी करायाला बहीण किव्वा भाऊच का हवा?मी एक स्त्री आहे,  देवाने मला स्वतःचा असा भाऊ दिला नाही, त्यामुळे मला कदाचित याचे महत्व कळणार नाही. 

देवाने मला भाऊ दिला नाही याची जाणीव मला दरवर्षी या सणाला होते. जेव्हा आपल्या भावासाठी राख्या विकत घ्यायला मैत्रिणी दिमाखाने दुकानात जातात,  मला खूप कुतूहल वाटते, इतके काय दडलेय त्या राखीत?..... भाऊ का हवा?.....  रक्षणाला? ..... कोणाच्या? ...... फक्त माझ्या?

रस्त्यावर हातात राखी बांधून फिरताना अनेक पुरुष दिसतात, बहिणीला रक्षणाचे वचन देऊन आल्यावर रस्त्यावरच्या प्रत्येक स्त्रीचे डोळ्याने वस्त्रहरण करणारे, असे भाऊ असतात का? बाकी, बलात्कार करणाऱ्यांना सुद्धा बहिणी असतीलच आणि त्यांनी पण हाताला कधी ना कधी राखी बांधली असेलच. मग मुलीवर अत्याचार करणारे ते हात रक्षणास समर्थ होते का? 

सासुरवाशीण बहिणीला राखी बांधून घरी परतल्यावर दारू पिऊन बायकोला, मुलांना बेधम मारणारे पुरुष म्हणजेच ते भाऊ का? बायकोकडून हुंडा मागणारे, तिचे शोषण करणारे, हेच का ते भाऊ आहेत?

आपल्याच आई वडिलांच्या घराचा, जमिनीचा, मालमत्तेचा वारसा घेऊन तो हक्काने देशोधडीला लावणारे सुद्धा भाऊ आहेतच की.

कंसाने, रावणाने  सुद्धा पाप कर्मात  त्यांच्या रक्षणासाठी आपल्या बहिणीचा वापर केला, राखी बांधून भावाच्या पापात हातभर लावणाऱ्या शूर्पणखा, पुतना आज सुद्धा सापडतील. पण आता त्यांचा वध करणारे श्रीराम, श्रीकृष्ण कुठे आहेत? कधी येतील? 

खरे तर स्त्री खुप सामर्थ्यवान आहे, तिला रक्षणाची गरजच नाही, ती क्षणोक्षणी काटकसर करणारी महालक्षमी  असते आणि  गप्प पुरुषाचा अहंकार व अत्याचार सहन करणारी महिषासुरमर्दिनी सुद्धा असते. वनवासाला गेलेली सीता, दुर्योधनाच्या अत्याचार सहन करणारी पाच पांडवांची पत्नी द्रौपदी ह्यांचे रक्षण करायला त्यांचे सक्खे भाऊ आले होते का?  नाही. हा विचार मला सुखावतो, मग वाटते कशाला हवा भाऊ? 

ज्यांना भाऊ आहेत त्यांच्यासाठी एक अनमोल राखी असेल, ती राखी म्हणजे फक्त आपल्या बहिणीच्या रक्षणाची  नव्हे,  तर सर्व स्त्रियांच्या, किव्वा सर्वांच्याच किव्वा समस्त देशाच्याच रक्षणाची जवाबदारी असेल. ती अनमोल राखी लवकरच बांधली गेली नाही तर श्रीविष्णूला लवकरच अश्या भावांचा वध करायला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. 



























Sunday, January 7, 2018

सासूबाई झिंदाबाद


नेहमी आपण बायकोवर व तिच्या माहेरच्यांवर विनोद करतो... आज जरा सासरच्यांकडे पाहूया 😀😀
लग्नाआधी😎 प्रत्येक मुलीने हे पाठ करून ठेवावे व नंतर 😣😣😉 सतत मान्य करत राहावे. 😄😂
जगातील सर्वात कर्तृत्ववान पुरुष म्हणजे , "माझा मुलगा " असे सासू म्हणते... 😛
जगातील सर्वात आदर्श व प्रेमळ आई- बाप फक्त आपल्या पतिदेवाचे. 😆
जगातील सर्वात सहनशील स्त्री असेल तर फक्त आपल्या नणदेची आई, आपली सासूच... 😌
जगातील सर्वात सुगरण, गृहकृत्यदक्ष स्त्री म्हणजे कोण?? आपल्या सासऱ्याची बायको... सासूचं हो, अजून कोण??🙄
जगातील सर्वात समजूतदार दानशूर व व्यवहारी माहेर म्हणजे आपल्या नणंदेचे. 😂😂
जगातील सर्वात प्रेमळ नातेवाईक, ज्यांनी कधी, काहीच चुका नाही केल्या व करणाराही नाहीत, ते म्हणजे सासूच्या माहेरचे... 😊😊😊
पण सर्वात महत्वाची गोष्ट विसरलोच...
जगातील सर्वात वाईट सासर😥 हे फक्त सासूच्या आणि नणंद असेल तर तिच्याच नशिबात असते.... 😪😯😌🙄😂
😂😂😂😂😂






Wednesday, November 8, 2017

दोन बायका भाजी करताना काय होते नक्की वाचा खूप इंटरेस्टिंग आहे...

दोन बायका भाजी करताना काय होते नक्की वाचा खूप इंटरेस्टिंग आहे...
दोन बायका स्वयंपाक करत असतात... 😜😜
पहिली बाई: फोडणी देताना मी पहिले मोहरी टाकते. 
दुसरी बाई: अगं मी तर पहिले काडिपत्ते  टाकते त्याने छान फ्लेवर येतो. 
पहिली बाई: अगं पण ते जळतात त्या पेक्षा ना सर्वात लास्ट ला टाकत जा फोडणीत. 
दुसरी बाई: हो मी लास्ट ला पाणी टाकते थोडेसे म्हणजे जळत नाही फोडणी. 
शेवटी कशी बशी फोडणी टाकून झाली की, पहिली बाई भाजी टाकू लागते,
दुसरी बाई: अंग भाजी नीट चिरली नाही गेलीये, जरा बारीक हवी होती. 
पहिली बाई: मला वाटले जरा मोठे काप असले की शिजल्यावर एक्दम लगदा नको ना व्हायला, म्हणून असे कापले. 
भाजी मिक्स केल्यावर, पहिली बाई झाकण ठेवते... 
दुसरी बाई: अगं झाकण इतक्या लवकर नको ठेवत जाऊ, थोडे शिजू देत जा, मग ठेव. 
पहिली बाई: उलट लवकर ठेवावे म्हणजे गॅस वाया जात नाही. 
शेवटी भाजी तयार होते मग सर्व खायला बसतात, "भाजी उत्तम झालीये" असे ऐकायला मिळते. 
" मग ही  भाजी वाटते तितकी सोपी नाहीये." , पहिली बाई म्हणते. 
" दोघींनी मिळून बनवली आहे." दुसरी बाई म्हणते, "वाटते तितकी सोप नाहीये, खरंच!!" 😁😅😅😅😅😅😅😂😂😂😂

Sunday, October 29, 2017

फराळाचा भुगा!!


टेबल पुसून झाल्यावर ६० वर्षांचे कृष्णराव बाजूच्या कपाटातल्या फाईल नीट ठेवत होते तेवढ्यात कॅबीनचा दरवाजा उघडला आणि रोहित साहेब, म्हणजेच रोहित जयवंत तावडे, आत आले. गेल्यावर्षी  त्यांच्या आई बाबांचे एका दुर्घटनेत अकस्मात निधन झाल्यामुळे त्यांना अमेरिका सोडून भारतात यावे लागले व आपल्या बापाने रचलेला २५ वर्षांचा व्यवसाय ३५ वर्षांच्या वयात पुढे चालवावा लागला.  ऑफिस मधली  हि त्यांची पहिलीच दिवाळी होती. आत येताच ते त्वरित खुर्चीवर बसले, आणि आपल्या टेबल वरच्या फोन वरून एक नंबर दाबला. "हॅलो...हा ढेरे साहेब...  हा सॉरी, अहो खरंच सॉरी मी  विसरलोच तुम्हाला फोने करायला, अहो तुमची दिवाळीतली  मिठाई आणि ग्रीटिंग पाहून माझी मुलगी खूप आनंदी झाली....  खूप खूप धन्यवाद! काही नाही आता मी निघतोय. मिटिंग ला बोलूया, शेवटी हा करोडोंचा कॉन्ट्रॅक्ट आहे, आम्ही गमावू शकतच नाहीत तुमच्या साऱ्या अटी मान्य आहेत आम्हाला. आजच फायनल करूया ,सौदा पक्का! ....  ओके साहेब भेटूया मिटिंग ला.....  बाय !" म्हणत त्यांनी फोन ठेऊन दिला.

बाजूला उभे असलेले  कृष्णराव रोहित साहेबांकडे पाहताच होते, " अरे कृष्णा जरा ती फा ०१ फाईल दे मला कपाटातून." साहेबांचे वाक्य ऐकून लगेच कृष्णराव फाईल शोधू लागले  पण ५ मिनिटे झाली तरी मिळेना. " काय कृष्णराव?  आता जमत नाही काम तुम्हाला... साठी ओलांडली, आराम करा घरी, एक फाईल शोधायला इतका वेळ लागतोय. माझी मिटिंग ची वेळ निघून जाईल जरा शोध या टेबल खाली असेल...हि घे चावी." म्हणत एका टेबलाकडे बोट दाखवले.  दिलेल्या चावीने उघडून कृष्णराव त्या टेबल खालच्या कपाटात फाईल  शोधू लागले, " माझे बाबा होते म्हणून चालायचे तुमचे.... आता कायद्याप्रमाणे रिटायर व्हायला हवे तुम्ही... मी अमेरिकेतून शिकून आलोय काम करून आलोय... भावना बाजूला ठेऊन काही निर्णय घ्यावे लागतात..."

कृष्णराव एक फाईल काढू लागला तेवढ्यात गचकन एक पिशवी खाली पडली... त्यात कृष्णरावने दिवाळी आधी दिलेला फराळ होता...  जमिनीवर सांडून त्याचा भुगा झाला , " अरे कृष्णा हे काय? अरे ती पिशवी खाली पाडलीस....  कचरा झाला सगळा.. साफ करून घे.... आता मी निघतोय मला मिटिंग आहे ..... " हे म्हणत फाईल घेऊन रोहित साहेब निघून गेले.

पण  ह्या घटनेने फराळाचा नाही तर एका मनाचा भुगा झाला होता...आपल्या नातीने बनवून दिलेले दिवाळी ग्रिटिंग सुद्धा अजून कपाटात पाकिटात बंद पडलेय या टेबलाखाली... हे पाहून मनाचा चुराडा झाला होता. जयवंत साहेब असते तर आज त्यांनी आपला फराळ "बेश्ट हाय !!" म्हणत दाद दिली असती... नातीला खोटे सांगावे नसते लागले " बाळ  तुझे ग्रीटिंग पाहुन साहेब खूप खुश झालेत!!" साहेबांनी तिला गेले काही वर्ष भेट म्हणून  दिलेली मोठी टॉफी आज मलाच न्यावी लागेल... आज पासून इथे परत यायचे नाही... तनाने नाही तर मानाने रिटायर होतोय मी जयवंत साहेब..... माफ करा मला!.. असे मनात म्हणत कृष्णराव अश्रुंचे घोट पित कॅबिन बाहेर निघून गेले.

कळत-नकळत आपल्या दैनंदिन जीवनात हे रोज घडते. कोणाची पाच रुपयांची सुद्धा भेट हि मनाला आनंद देणारी असली पहिले कारण त्या पाच रुपयात सुद्धा त्या व्यक्तीचा अनमोल वेळ व श्रम असतात आणि सर्वात महत्वाच्या भावना .... अश्या व्यक्तींना फक्त गरज असते आपल्या प्रतिसादाची... तेच द्यायचे राहून जाते.






Sunday, March 6, 2016

पप्पांचे व्हाटसप!! पप्पांचे फेसबुक!!


" चार दिवस झाले, यामी नीट  खात नाही, पीत नाही, निट बोलत नाही. परीक्षा चालू आहे, पण अभ्यासात तिचे  मन लागत नाही. आज मी तिला संध्याकाळी विचारते काय झाले आहे नक्की?  अशी का वागतेस?  आता आठवीत गेली, मोठी झाली, शाळेत कोणी ओरडले, कोणी मुलानी वगैरे काही त्रास तर दिला नाही तिला?  " आपल्या  मुलीबद्दल असे असंख्य विचार इशाला सतावत होते वं  ऑफिसच्या कामात तिचे मन लागत नव्हते.

संध्याकाळी घरी आल्यावर, यामी आणि इशा चहा घेत होते तेव्हा ईशाने ठरवल्या प्रमाणे विषय काढाला, "हे बघ यामी,  आत्ता घरात फक्त तू आणि मी आहोत, तुझ्या मनात नक्की काय चाललय, मला कळू दे. आई आहे मी तुझी मला सांग. मन मोकळे कर. नेहमी बडबड करून मला, दादाला आणि पप्पांना सतावणारी यामी कुठे हरवली आहे का? इतकी शांत का? मला त्रास होतोय बाळा. दादा आणि पप्पा घरी नाहीत तू मला आत्ताच सांग काय कारण आहे?"

यामी थोडा वेळ नजर खाली टाकून शांतच राहिली. मग थोड्यावेळाने तिने आपल्या आईकडे अश्रू पुसत आपल्या शांततेचं  कारण सांगू लागली "आई पर्वा  मी पप्पांचा मोबाईल घेतला होता, आता मला कळले ते मला मोबाईलला हात का लावू देत नाही…. " एवढे म्हणून ती अजून रडू लागली.

"अगं  यामी, शांत हो !! काय बोलायचं पूर्ण बोल घाबरू नकोस." इशा ने तिला बोलण्यासाठी प्रोस्त्साहित केले.

"मी पप्पांचे वॉट्सप (watsapp ) पाहिले त्यात एका स्त्रीचे  खूप घाण चित्रीकरण होते. पण  त्यामुळे  मी इतकी दुखावले गेले, पप्पांनी त्या चित्रावर लिहिलेल्या घाण टीका वाचून मला घृणा आली आहे. एवढेच नाही आई,  मग मी कुतूहल म्हणून  पप्पांचे फेसबुक(facebook ) पण पहिले, त्यात पण पप्पांनी अनेक स्त्रियांशी घाण गप्पा मारल्या आहेत." एवढे बोलून ती हुंदका देऊन रडू लागली,  " मला पप्पांची घाण वाटतेय. मला राग आलाय. काय करू मी? अभ्यासाला बसते  तेव्हा पण हेच डोक्यात येते, आपले पप्पा असे आहेत. शी!! आत्ताच्या परिस्थितीत मुलींना सुरक्षित कसे ठेवावे या विचाराने  प्रत्येक बापाचे हृदय धडधडत असेल ना? पण माझे पप्पा असे का वागले? ते माझे रक्षण करू शकतील ना? जर त्यांचेच विचार इतके हीन आहेत, तर मी या समाजात असलेल्या प्रत्येक पुरुषाकडून काय अपेक्षा करू? आई, शाळेतून येता जाता अनेक पुरुष माझ्या समोरून जातात, कुणाचे डोळे तर कुणाचे हात रोजच माझ्या शरीराचा मला राग येईल अशी हरकत करत असतात, पण मी नजर अंदाज करते आणि मुकाट्याने सहन करते, कारण त्या पुरुष म्हणवून घेणाऱ्या पुरुषांशी माझा काही एक संबंध नाही. पण पप्पांना मी कसे नझर अंदाज करू? त्यांना कसे विचारू? " इतके बोलून यामी ढसा- ढसा  रडू लागली. तिच्या मनावर परिणाम झाला होता.

 ईशावर यामीच्या  प्रश्नांची वीज कोसळली होती. ती निरुत्तर झाली होती.

खरच  या टेक्नोलोजीच्या युगात, आपल्या विचारांना, वागण्याला आता काही कुंपण राहिले नाही, टचस्क्रीन वर टच  करून  आपण रोज अनेक विनोद, विचार, चित्र , एक मेकांशी वाटतो, पण आपल्या आजू बाजूला असलेल्या व्यक्तींच्या मनाला स्पर्श होईल असे वागतोय का? याचे सुद्धा भान ठेवले पाहिजे.